पुणे : ‘न संपणारी जीवघेणी स्पर्धा आणि सततची तुलना मानवाला घातक आहे. भौतिक गोष्टींबद्दलचा हव्यास आणि असमाधान यांच्यामुळे माणूस आपले मन:स्वास्थ हरवून बसला आहे. सततची स्पर्धा, अवास्तव अपेक्षा या रेसमध्ये सध्या लोक धावत आहेत; पण या रेसमध्ये धावू नका. यातून काहीच सकारात्मक निर्माण होणार नाही. आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने जगायला शिका,’ असे विचार अच्युत गोडबोले यांनी मांडले. निमित्त होते वाचन जागर महोत्सवाच्या निमित्ताने अक्षरधारा बुक गॅलरी आयोजित ‘मनक्ल्लोळ – मनोविकारांचा मागोवा’ या कार्यक्रमाचे.
या वेळी मिलिंद खाडे यांनी अच्युत गोडबोले व नीलांबरी जोशी यांच्याशी संवाद साधला. या वेळी गोडबोले म्हणाले, ‘सध्या लोक स्वत:च्या मनापेक्षा लोकांना काय वाटेल, याचाच जास्त विचार करतात. लोकांच्या मताला अवाजवी महत्त्व दिल्यामुळे आपण ‘सेल्फ इमेज’ (स्वप्रतिमा) आणि ‘सेल्फ एस्टिम’ (स्वाभिमान) या गोष्टी गमावून बसतो.’
न्यूनगंडाविषयी बोलताना गोडबोले म्हणाले, ‘एरिक फ्रॉमनने न्यूनगंडाविषयी सुंदर व्याख्या केली आहे ती अशी, की न्युनगंड म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट येत नाही असं वाटणं नसून, न्यूनगंड म्हणजे आपल्याला असं वाटणं की इतरांना असं वाटतं, की आपल्याला ती गोष्ट येत नाही.’
हल्ली सोशल मीडियामुळे निर्माण होत असलेल्या मनोविकृतींवर भाष्य करताना काही नीलांबरी जोशी यांनी हृदययद्रावक घटनासुद्धा सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘हल्ली सतत सेल्फी काढणं, पाच पाच मिनिटाला फेसबुक व व्हॉट्सअॅपवरील अपडेट चेक करणं, ‘ब्लू व्हेल’सारख्या गेम्समुळे होत असलेल्या आत्महत्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टींमुळे मनोविकारांचा नव्याने मागोवा घेण्याची गरज वाटते आहे.’
मनोविकार कसे ओळखावेत व त्यावर कशी मात करावी, याविषयी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी वाचकांना मार्गदर्शन केले. ‘अक्षरधारा’च्या रसिका राठिवडेकर व ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर यांनी पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. मुकेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.